Subscribe Us

Header Ads

३२ खोके.. एकदम ओके... भाजप - राष्ट्रवादीने संगनमत करत जमीन खरेदीचा महाघोटाळा केला आहे - किरण काळेंचा आरोप, महापालिका तात्काळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची काँग्रेस मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

 

३२ खोके.. एकदम ओके... भाजप - राष्ट्रवादीने संगनमत करत जमीन खरेदीचा महाघोटाळा केला आहे - किरण काळेंचा आरोप, महापालिका तात्काळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची काँग्रेस मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार

अहमदनगर प्राईड वेब न्यूज टीम : भाजप नगरसेविका आशाताई शिवाजी कराळे यांच्या पतीच्या नावे असणारी सर्वे नंबर 261/अ/1 ही कागदावर असणारी ४ एकरची जमीन राष्ट्रवादीच्या मध्यस्थीने संगनमत करत रु. ३२ कोटींच्या चढा नागरिकांच्या पैशातून महापालिका खरेदी करत मनपाने आजरोजी कागदावर महाघोटाळा केला आहे. यास तीव्र विरोध न झाल्यास उद्या हा कागदावरचा घोटाळा पैशांच्या बॅगा भरून राबविला जाईल. काँग्रेस हे कदापी होऊ देणार नाही, असा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी "शिवनेरी" येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. 

महानगरपालिकेतला आजवरचा हा जमीन खरेदीचा सर्वात मोठा महाघोटाळा आहे. अलीबाबा चाळीस चोरांची टोळी महानगरपालिका आणि नगरकरांचा जीव घेऊ पाहत आहे. खड्ड्यांमधून रोज वाट शोधणाऱ्या सामान्य लाखो नगरकरांचा जीव जाण्यापूर्वीच या महाघोटाळ्याची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस होऊ देणार नाही, असा इशारा काळे यांनी दिला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी हातामध्ये "३२ खोके, एकदम ओके" असे फलक माध्यमांसमोर झळकवत घोषणा देत पारित करण्यात आलेल्या ठरावाच्या निषेध केला. 

काळे यांनी यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले ते म्हणाले की, भाजप, राष्ट्रवादी ही या शहरातील शहराच्या आयुर्वेदिक कट्ट्यावरील नेत्याच्या नेतृत्वाखाली असणारी जुनी अभद्र युती आहे. देशाचे नेते शरद पवार यांच्या आदेशाला केराची टोपी दाखवत तेव्हापासून सुरू झालेली ही युती आता आर्थिक संगनमतातून सामान्य नगरकरांची लूट करीत आहे. जे पवारांसारख्या देशातील मोठ्या नेत्यांना झुगारून लावतात ते सामान्य नगरकरांची काय तमा बाळगणार. महापालिकेतील हा जमीन खरेदी महाघोटाळा हा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू असून या महाघोटाळ्यात सहभागी असणाऱ्यांच्या बैठका या त्यांच्याच विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली पार पडल्याची खात्रीलायक माहिती असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.  

सातबारावर सुमारे ४ एकर क्षेत्राचा उल्लेख आहे. महापालिकेने ही जागा उपलब्ध करून देण्याबाबत भाजप नगरसेविका कराळे यांना लेखी पत्र दिले असून त्यात त्यांचा गौरव केला आहे. कराळे यांनी याला लेखी उत्तर महापालिकेला दिले असून या गौरवाचा स्वीकार करत सदर जमिनीचा चांगला मोबदला मिळाला तरच जमीन देऊ, असे लेखी उत्तर दिले आहे. भाजप नगरसेवकाने जागा काही बक्षीसपत्र करून किंवा मोफत देण्याची तयारी दाखवलेली नाही. त्यामुळे त्यांचा यात गौरव कसला केला जात आहे ? भाजप नगरसेवकाची ही जमीन महापालिकेला नियोजनपूर्वक विकण्यासाठी पूर्वीपासूनच षडयंत्र रचले गेले आहे. आयुक्तांसमवेत राष्ट्रवादीच्या नगरसेवक संपत बारस्कर यांनी स्वतः भाजपच्या कराळे यांच्या जागेची स्थळपाहणी केली असून जागा घेण्यासाठी महासभेपूर्वीपासून मनपाकडे तगादा लावला आहे. 

यातील एक धक्कादायक प्रकार काळे यांनी समोर आणला आहे. मनपा आयुक्तांनी 27. 07. 2020 रोजी जागामालक शिवाजी कराळे यांना लेटर ऑफ इंटेंट दिले असून यापूर्वी याच सर्वे नंबर मधील अधिग्रहित केलेल्या सुमारे 3750.90 स्क्वेअर मीटर जागेसाठी टीडीआर सर्टिफिकेट दिलेले आहे. त्यावेळी आर्थिक मोबदला देण्यात आलेला नव्हता. यावेळी मात्र कागदावर असणारे ४ एकराचे क्षेत्र प्रत्यक्षात खरोखर ४ एकर आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता थेट ३२ कोटी रुपयांचा दर वाटाघाटीची कोणतीही प्रक्रिया न राबवता कसं काय निश्चित करण्यात आला ? मुळात ही चार एकर जागा चार एकर भरतच असून ती त्यापेक्षा खूप कमी भरते, असा दावा काँग्रेसने केला आहे. भाजप नगरसेवकाने आपल्या पदाचा गैरवापर करत स्वतःची जागा स्वतः सदस्य असलेल्या सार्वजनिक संस्थेला अत्यंत चढा भावाने विकण्यास पुढे येत आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्यासंदर्भात कायद्यात काही तरतुदी आहेत यासाठी कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.  

या लुटीला विरोध करण्या ऐवजी नगरसेवक सभागृहातून पळून गेले. नगरकर त्या नगरसेवकांना माफ करणार नाहीत 

केवळ ३२ खोके, एकदम ओके हा मलिदा खोके घेणाऱ्यांपर्यंत पोहोचल्यामुळे सभागृहात तुरळक नगरसेवकांची लेखी पत्रे वगळता कोणी विरोध केला नाही. त्यामुळे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहात सुद्धा गप्प बसणारे आता रस्त्यावर उतरून विरोध करायला लागले तर आश्चर्य वाटू नये. मात्र नगरकरांची लूट करणारा ठराव महासभेत मंजूर होतो. ही सर्व नगरसेवकांनी नैतिकता गमावणारी गोष्ट असून या आर्थिक अराजकेतेचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने तात्काळ महानगरपालिका बरखास्त करून तुकाराम मुंडेंसारखा कडक शिस्तीचा आयएएस अधिकारी प्रशासक म्हणून पाठवावा अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्र पाठवून मागणी करणार आहोत, असे काळे यांनी यावेळी जाहीर केले.

दुसरा पर्याय असताना तोही मनपाने जाणीवपूर्वक नाकारला

मनपाला जुनी आरक्षित जागा यासाठी योग्य वाटत नसेल तर नगर - मनमाड महामार्गलगत एमआयडीसी पूल उतरल्यानंतर सुमारे ५ एकरची जागा असून त्या ठिकाणी स्मशानभूमी, दफनभूमी आणि ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमीची जागा आरक्षित आहे. तसा ठरावही पालिकेत झाला असून त्या जागेचे मालक सोनवणे महानगरपालिकेला जागा देण्यासही तयार आहेत. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. या बाबत न्यायालयात लढा चालू आहे. मात्र ही जागा न घेता 32 कोटी रुपये खर्च करून महानगरपालिका आडवळणाची महागडी जागा घेऊन जनतेच्या पैशाची लूट करायची आहे, असा आरोप काळे यांनी केला आहे. 

नगररचनाकरांना निलंबित करा 

मनपाचे नगररचनाकार राम चारठणकर यांनी या भ्रष्टाचाराचे षडयंत्र रचले आहे. अशा प्रकारे प्रस्ताव मांडून तो संगनमताने पारित करून घेणे हा कागदावरती सिद्ध झालेला भ्रष्टाचार आहे. त्यामुळे कायम वादग्रस्त राहिलेल्या नगररचनाकार यांचे तात्काळ निलंबन आयुक्तांनी करावे अशी आमची मागणी आहे. नगर रचनाकारांच्या विरोधात अँटी करप्शनकडे देखील काँग्रेस चौकशीची मागणी करणार आहे. आज सकाळीच आम्ही आयुक्तांची काँग्रेस शिष्टमंडळासह भेट घेतली असून महासभेने मंजूर केलेला ठराव विखंडित करावा अशी लेखी मागणी त्यांच्याकडे केली आहे. 

हे ३२ कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी तात्काळ खर्च करा 

रस्त्यांसाठी, खड्ड्यांसाठी पैसे नाही अशा बोंबा मारणाऱ्या मनपाने तात्काळ या ३२ कोटी रुपयांतून शहरातील खड्डे आणि रस्ते यांची कामे करण्यासाठी निवीदा काढून नगरकरांना रस्त्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावी. पैसे आहेत तर ते खोक्यांमध्ये घालून कोणाच्या घशात घालू नये, असे काळे यांनी म्हटले आहे. 

नागरिकांनी भ्रष्टाचारी नगरसेवकांना निवडून देऊ नये 

नगरसेवक मग ते कोणत्याही पक्षाचा असोत. ते जर जनतेची सेवा करत नसतील आणि केवळ भ्रष्टाचार करत असतील तर अशा नगरसेवकांना नागरिकांनी शहाणे होत निवडून देऊ नये. ३२ खोके घेऊन जिरवणारे नगरसेवक याच खोक्यांमधले पैसे उद्या निवडणुका लागल्या की तुमच्या - आमच्या दारात पाचशे, हजारच्या नोटा भीक म्हणून टाकायला येतात आणि नंतर पाच वर्ष जनतेच्या हिताची कोणती कामे न करता महानगरपालिकेत बसून संगनमत करत चोऱ्या करतात. त्यामुळे नगरकरांनी आता सावध होत एक वर्षावर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये सर्व भ्रष्टाचारी नगरसेवकांना खड्यासारखे वेचून बाजूला फेकून द्यावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे. 

आता नागरिकच नगरसेवकांना कायमचे रद्द करतील 

महापालिकेच्या चुकीच्या निर्णयांबद्दल दरवेळी उच्चन्यायालयात दाद मागायला का म्हणून नगरकरांनी जायचं ? नैतिकता गमावलेल्या नगरसेवकांनी तात्काळ पुन्हा विशेष महासभा घेत हा ठराव रद्द करावा. अन्यथा नागरिक येत्या निवडणुकीत तुम्हाला कदापि महानगरपालिकेत निवडून पाठवणार नाहीत. तेच तुम्हाला कायमचे रद्द करतील, असा टोला काळे यांनी यावेळी लगावला आहे. 

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस नेते अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण गीते पाटील, उपाध्यक्ष गौरव घोरपडे, प्रशांत जाधव, सावेडी काँग्रेस विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, गणेशभाऊ चव्हाण, विद्यार्थी काँग्रेसचे किशोर कांबळे, आकाश जाधव आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments