Subscribe Us

Header Ads

संपादकीय : शुभारंभाच्या निमित्ताने...



लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. देशाच्या एकूण व्यवस्थेमध्ये माध्यमांना विशेष महत्त्व अलिकडच्या काळात प्राप्त झाले आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून हा प्रवास आता डिजिटल मीडिया पर्यंत येऊन ठेपला आहे. घटना घडता क्षणीच त्याची बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम डिजिटल मीडिया करत आहे. 

मात्र तत्पर असताना अचूक, सत्य, योग्य आणि निर्भीड भाष्य करणारी माध्यम ही नवीन गरज निर्माण झाली आहे. माध्यमांनी तटस्थ असणं आवश्यक आहे. समाजात विविध क्षेत्रांमध्ये जे अवती-भवती दररोज घडत आहे ते जसच्या तस सर्वांपर्यंत पोहोचवणे याला बातमी असं म्हटलं जातं. बातम्यांचे विश्लेषण करणे हा एक वेगळा विषय आहे. मात्र वाचकांपर्यंत बातमीच्या माध्यमातून घडणाऱ्या घटनांची वस्तुस्थिती पोहोचविणे ही सर्वच माध्यम प्रकारांची आणि माध्यम समूहांची जबाबदारी आहे. 

अहमदनगर प्राईड न्यूज पोर्टलच्या माध्यमातून देश-विदेश, राज्य स्तरापासून ते अगदी अहमदनगर मधील स्थानिक विविध क्षेत्रातील घडामोडींपर्यंतच्या इत्तंभुत बातम्या, बातम्यांच्या मागे सत्य कहाण्या आणि बातम्यांचे निर्भीड विश्लेषण आम्ही करणार आहोत. सत्य आपल्यापर्यंत पोहोचत असताना त्याची अधिक खात्री करून मगच ते आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. 

माध्यमांनी कुठल्या एका विचाराचे किंवा बाजूचा असू नये. तर समाजाच्या विविध घटकांमध्ये उमटणाऱ्या तरंगांचं प्रतिबिंब हे माध्यमांमधून वाचकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. ती भूमिका निर्भीडपणे अदा करण्याचे काम अहमदनगर प्राईड न्यूज पोर्टल करणार आहे. 

आज दि. ५ नोव्हेंबर २०२२ पासून आम्ही या कार्यास सुरुवात करीत आहोत. आमची टीम यासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहे. आम्हाला खात्री आहे की आमची टीम डिजिटल न्यूज वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल आणि जनसामान्यांचा आवाज बनेल.

तूर्तास धन्यवाद... ! 

संपादक

अहमदनगर प्राईड न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments