Subscribe Us

Header Ads

अहमदनगर शहर : काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जात मतदार संपर्क अभियान राबवावे - प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे


काँग्रेस करणार सोशल इंजिनिअरिंग - शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे

लवकरच शहर जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीचे आयोजन

प्रतिनिधी : लवकरच नगर शहरात महानगरपालिका, देशात लोकसभा व राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. महाराष्ट्राने कधी नव्हे ते या पंचवार्षिकमध्ये राजकारणातील अनेक धक्कादायक अविश्वासनीय घडामोडींचा अनुभव घेतला. मात्र काँग्रेसने पक्ष म्हणून कायम जनते समवेत असलेली बांधिलकी जपण्याचे काम केले. शहरात पक्षाचे संघटन उत्तम आहे. ते अधिक मजबूत करत कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी घरोघरी जात मतदार संपर्क अभियान राबवावे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे यांनी केले आहे. 

नगर शहराच्या दौऱ्यावर आले असता शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना नगराळे बोलत होते.

अहमदनगर शहर दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे यांचा सत्कार करताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे. समवेत दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला आदी.

नगराळे म्हणाले की, 

लवकरच किरण काळे यांच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या तीन वर्षात शहरातील काँग्रेसने मरगळ झटकत उत्तम संघटनात्मक बांधणी केली आहे. यात आता प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मतदार संपर्क अभियानच्या माध्यमातून त्रिस्तरीय समित्यांचे गठन करण्यात येणार आहे. यामध्ये बूथस्तरीय, मंडळस्तरीय व प्रभागस्तरीय समित्या तयार करण्यात येणार आहेत. प्रभाग समितीमध्ये १०० सदस्यांचा समावेश असणार असून मंडळस्तरीय समित्यांमध्ये २५ सदस्य तर बूथ समित्यांमध्ये १० सदस्य असणार आहेत. 

या समित्या गठीत करताना काँग्रेस शहरामध्ये सोशल इंजिनिअरिंग करणार असून समाजातील ओपन, ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी यासह बारा बलुतेदार, अठरा अलूतेदार तसेच युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, कामगार, फेरीवाले, हातगाडीवाले, विद्यार्थी अशा सर्व स्तरातील घटकांना संघटनेत काँग्रेस स्थान देणार आहे. या समितांच्या माध्यमातून पक्षाने स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या योगदानाचा खरा इतिहास, केलेली विकास कामे, प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या शहर विकासाच्या बाबतीत त्यांच्या असणाऱ्या संकल्पना व अपेक्षा याबाबत या संपर्क अभियानामध्ये कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधणार असल्याचे नगराळे यावेळी म्हणाले. 

किरण काळे म्हणाले की, 

संघटनात्मक नवीन त्रिस्तरीय रचनेमुळे या माध्यमातून अनेक घटक पक्षाशी जोडले जाणार आहे. अनेक नवीन कार्यकर्त्यांना पक्षात विविध पदावर काम करण्याची संधी निर्माण होणार आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पक्ष संघटन या माध्यमातून अधिक बळकट करण्याचे काम केले जाईल. 

लवकरच बैठक 

दरम्यान, लवकरच या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी, सध्याच्या बदलत्या राजकीय स्थितीमध्ये कशा पद्धतीने काम करावे यासंदर्भात संवाद साधण्यासाठी व संघटनात्मक आढावा घेण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते विविध सेल, फ्रंटल, विभाग यांची बैठक शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हा सरचिटणीस तथा काँग्रेस व्यापारी व उद्योजक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष मनसुख संचेती यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments